कोणी कुणाचा नातलग लागू नये,
तरीही प्रापंचिक अपघातात
फ्रॅक्चर झालेल्या खांद्यावरून
जमेल तितक्यांच्या वजनदार तिरडयांना
शेवटचे गावदर्शन करवून
सुखरूप पोहोचवून यावे
सरकारी स्मशानात.
कोणी आपल्या एकटेपणाचा
सबळ पुरावा मागीतलाच
तर लिहून दाखवाव्यात त्याला अश्या कविता
स्वत:च्या सहीनिशी झोकदार.
किंवा
वर्षातून एकदा एकटेच
देहू,आळंदी,पंढरपूर ची
करावी आत्मशोधार्थ वारी.
तरीही त्यांतल्या त्यांत
चार बळकट खांद्यांची
सांधेदुखी जिद्दीने पोसावी -
आपल्या एकांत-मढ्याचा
भार बळजबरीने सोसणारी.